एका GR ने मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत:एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन; म्हणाले - कायदेशीर अडचणी अजूनही दूर करायच्या आहेत
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचे प्रश्न केवळ एका जीआरमुळे सुटणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. सरकारच्या जीआरचा मराठा समाजाला नक्की फायदा होईल. पण त्यांचे प्रश्न केवळ एका जीआरमुळे सुटणार नाहीत. सरकार या प्रकरणी सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची मंगळवारी यशस्वी सांगता झाली. सरकारने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर जारी केल्यामुळे जरांगे व त्यांच्या समर्थकांनी मुंबई सोडली. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मराठा समाजाचे प्रश्न केवळ एका जीआरमुळे सुटणार नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, सरकारच्या जीआरचा मराठा समाजाला नक्की फायदा होईल. पण त्यांच्या संपूर्ण मागण्या या एका जीआरमुळे पूर्ण होऊ शकत नाहीत. सदर शासन निर्णय मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचला आहे. त्यांच्या संमतीनंतरच आपण तो निर्णय लागू केला.
त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तो आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांना दिला. जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या आणखी काही मागण्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही मुदत दिली आहे. त्यामुळे एका जीआरमुळे हे सगळे सुटणार नाही. पण सरकार टप्प्याटप्याने इतर गोष्टी करणार आहे. बरेच काही बाकी आहे. ते ही काम होईल. काही गोष्टी क्लिष्ट आहेत. कायदेशीर अडचणी आहेत. त्या दूर करायच्या आहेत. कोणत्याही समाजाची फसवणूक होऊ नये ही सरकारची भूमिका आहे.
ओबीसी समाजाला कोणताही धक्का नाही
ते पुढे म्हणाले, राज्य सरकारने अवघ्या अर्ध्या तासात शासन निर्णय लागू केला असला तरी, त्यावर आमचे तज्ज्ञ मागील 4 दिवसांपासून काम करत होते. विविध नियमांचा अभ्यास करत होते. या शासन निर्णयामुळे मराठा समाजाला जातप्रमाणपत्र मिळतील. हे करताना ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. कोणत्याही समाजाला मदत करत असताना, त्यांना सोयीसुविधा देत असताना इतर समाजाचे किंबहुना ओबीसींचे नुकसान होऊ नये ही सरकारची भूमिका होती व आजही आहे. प्रस्तुत शासन निर्णयामुळे कोणत्याही समाजाचे नुकसान होणार नाही.
प्रमाणपत्रांची पद्धत सोपी व सुटसुटीत होईल. नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. त्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळेल. सध्या जे लोक विरोध करत आहेत, त्यांनी हैदराबाद गॅझेटियरचा अभ्यास केल्यास त्यांच्या मनातील संभ्रम व शंका दूर होतील.
संजय राऊतांचा एकनाथ शिंदे, फडणीसांवर निशाणा
दुसरीकडे, संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सरकारमधील काही घटक जरांगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप केला. सरकारमधील काही घटक संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे यांनी माघार घेऊच नये आणि फडणवीस यांचे सरकार अडचणीत यावे अशी त्यांची इच्छा होती. सध्या महायुतीत कोणतीही स्ट्रॅटेजी नाही. त्यांनी या गोष्टी करू नये. ते आम्हाला तीनचाकी रिक्षा म्हणून हिनवत होते. आज ते ही तीनचाकी रिक्षाच आहेत. एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यामागे काय स्ट्रॅटेजी होती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले पाहिजे. कारण, इतके मोठे आंदोलक इथे आले. त्यांच्या गाड्या-घोड्यांची व्यवस्था करण्यात त्यांचेच नाव येत आहे. त्यांचा मुख्य उद्देश आरक्षण मिळवणे हा नव्हता, तर मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस यांचे समोर आव्हान उभे करणे हा होता.
जरांगे पाटील यांचे आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात होते. पण त्या आंदोलनाचा काही लोक राजकीयदृष्ट्या गैरवापर करून राज्याचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तत्काळ जी पाऊले उचलली, त्यानंतर ज्यांना हे सर्व घडवायचे होते, त्यांच्या सर्व योजना बारगळल्या, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List