मुंबई परिसरात झाडू , पोचा अन् घरकाम करणाऱ्या मराठा स्त्रियांची संख्या पावणेदोन लाखांहून अधिक ? राज्यकर्त्या समाजाच्या दुरावस्थेची हकिकत
मुंबई परिसरात झाडू , पोचा व घरकाम करणाऱ्या मराठा महिलांची संख्या पावणेदोन लाखांहून अधिक आहे. राज्यकर्त्या मराठा समाजाचे हे विदारक व वास्तव चित्र असून, इथे न्यायाची व आयोगाची किरणे अद्यापि पोहोचली नाहीत, अस लेखक व इतिहासकार विश्वास पाटील यांनी म्हटले आहे.
विश्वाल पाटील गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, घरी गेल्यावर आपल्या कामवाल्या ताईला तिचे आडनाव जरूर विचारा. बहुतांशी आपले आडनाव मोरे, माने, जाधव, मोहिते, कदम, परब, पवार, शिंदे, साबळे, राणे, घाडगे असेच सांगतील. कारण आज महानगरात कोकण आणि घाटावरच्या सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक गरीब आयाबहिणी हे काम करून आपली कुटुंबे चालवतात. 1982 च्या मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतर घाटावरच्या व कोकणी मराठ्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढ्या आता “झाडू पोता” आणि “धुणीभांडी” करण्याच्या राष्ट्रीय कामांमध्ये उतरल्या आहेत. या कामांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने समाजातील कोणताही उच्चवर्ग किंवा छोट्या वर्गातील लोक नाहीत, हे मुद्दाम ध्यानात ठेवावे.
कायद्याच्या वाटा, पळवाटा वापरून गिरण्या बंद पाडल्या
मंडल आयोग लागू झाला तेव्हा मुंबईमध्ये 62 गिरण्या, दोन लाख 65 हजार गिरणी कामगार आणि त्या गिरणगावाच्या जीवावर चालणाऱ्या इतर अलाईड उद्योगावर अवलंबून असे आठ लाख श्रमिक लोक मुंबईत जगत होते. कायद्याच्या वाटा, पळवाटा वापरून गिरण्या बंद पाडल्या गेल्या. कोट्यावधीचा एफएसआय सर्वांनी मिळून खाऊन टाकला. पण त्या गिरणगावावर जगणारी सुमारे आठ लाखाहून अधिक कुटुंबे कुठे गेली या सामाजिक वास्तवाचा विचार कोणी केला आहे का? मग घर चालवण्यासाठी ह्या गरिबांच्या नशिबी डोमेस्टिक वर्कर, धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणी म्हणून काम करायची वेळ आली. त्यापैकी बहुतांशी सर्व आयाबहिणी दिवसभरात चार चार, पाच पाच घरातली कामे आजही धावतपळत जाऊन सांभाळतात. अपुरे वेतन, मुलांची अर्धवट शिक्षण, मराठा कुणबी असल्याचा दाखला नाही. आधुनिकीकरणाचा तडाखा बसलेल्या या महानगरातील या गरिबांच्या अवस्थेचा कधी कोणी विचार केला आहे का!
हा विषय काही हुशार मंडळींना वाढू द्यायचा नव्हता
लेखकाला किंवा कवीला जात नसते. पण धर्म असतो! तो म्हणजे मानवता धर्म!! म्हणूनच मी 2015 मध्ये लालबाग-परळची कहाणी सांगणारी “लस्ट फॉर लालबाग“ नावाची कादंबरी लिहिली. तिच्या दोन महिन्यात, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2015 मध्ये तीन मोठ्या आवृत्त्या निघाल्या. पण गरिबांच्या मुंबईची कशी आणि कोणी वाताहत केली हा विषय काही हुशार मंडळींना वाढू द्यायचा नव्हता. म्हणून माझी ही कादंबरी वाङ्मयबाह्य कारणे उभी करून, कौशल्याने चर्चेतून बाहेर काढून हा विषयच अत्यंत कौशल्याने दाबून टाकला गेला. ज्यांनी लाखो-कोट्यावधीचा एफएसआय सहज पचवला, त्यांना एका मराठी लेखकाची कादंबरी दाबणे, चर्चेतून बाहेर काढणे फारशी अवघड गोष्ट नव्हती. मला आणि माझ्या कुटुंबाला अत्यंत छळातून जावे लागले. पण मूळ प्रश्न अद्याप संपलेले नाहीत, त्याचे काय?
गिरणी कामगार गेली कुठे?
या मुंबईवर 2000 सालापर्यंत महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांची अर्थव्यवस्था अवलंबून होती. हे सारे गिरणी कामगार व त्यांच्यावरचे इतर उद्योग एकाएकी बंद झाल्यावर ही माणसे गेली कुठे? ती जगतात कशी, याची दखल तरी कुठल्या आयोगाने किंवा मागासवर्गीय आयोगाने कधी घेतली आहे का? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये अनेक आकडेवारी आणि विषय मांडले गेले, त्यामध्ये या आठ लाख गरीब कुटुंबांचा विषय कधी आला का? गिरणगावच्या बेकारीमुळेच पुढे मराठी कुणब्यांच्या आणि कोकणी मराठ्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न अधिक बिकट झाला.
तथाकथित विद्वानांनी वाऱ्यावर सोडले
एकीकडे साखर कारखानदार व धनवान झालेली आणि सर्व राजकीय सत्ता आपल्या घराण्याच्या मुठीत ठेवण्याची कला संपादित केलेली 70 ते 80 मराठा कुटुंबे आपल्या वैभवात मश्गुल आहेत. ही घराणी म्हणजे मराठा समाज नव्हे. दुर्दैवाने उर्वरित गरीब वंचित मराठा समाजात आदळाआपट करून, ओरडून, गळा काढून समाजाचा विषय मार्गी लावून घेणारे कुशल नेतृत्व कधी जन्माला आले नाही. ज्या महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे नाव घेता, त्यांचे विचार आणि वाङ्मय बारकाईने वाचले तर याच श्रमिक कुणबी मराठा कुटुंबांबद्दल त्यांनी काय लिहिले आहे ते जरूर वाचा. वरील तिन्ही महान सामाजिक नेत्यांच्या लढाईमध्ये तेव्हा हाच गरीब समाज त्यांच्या पाठीमागे उन्हापावसात उभा होता. त्याचे पुरावे डोळ्याआड करू नका.
“झाडू पोता” व घरकाम करणाऱ्या या गरीब महिलांच्या पाठीमागे WDWM सारख्या काही सामाजिक संस्थांनी त्यांच्या मदतीस धावण्याचे सामाजिक कार्य केले आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही.
पण महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करणारी आणि मोठ्या मोठ्या आयोगावर काम करणाऱ्या तथाकथित विद्वानांनी या लोकांना नेहमीच वाऱ्यावर सोडले आहे, हे मान्य करावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
About The Author

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List